सात्रळ येथील ‘आनंद गुरुकुल'च्या दहावीतील विद्यार्थ्याना निरोप!
◻️ संस्कार आणि शिक्षणाची शिदोरी घेऊन विद्यार्थी नव्या क्षितिजांकडे झेपावण्यास सज्ज
संगमनेर LIVE (सात्रळ) | राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. शाळेच्या आवारात बुधवारी (दि. ११) पार पडलेल्या या सोहळ्याने विद्यार्थ्याच्या शालेय जीवनातील अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला.
संस्थेचे चेअरमन डॉ. के. के. बोरा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला, तर नववीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करत सभागृहाची आकर्षक सजावट केली होती.
यावेळी झालेल्या मनोगतांच्या सत्रात दहावीच्या विद्यार्थ्यानी आपल्या शालेय प्रवासातील आठवणींना उजाळा देत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. “आनंद गुरुकुलने आम्हाला केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर जगण्याचा आत्मविश्वास, शिस्त आणि सुसंस्कार दिले,” अशा शब्दांत विद्यार्थ्यानी आपल्या भावना मांडल्या. अनेक विद्यार्थ्यानी शाळेतील किस्से सांगताना भावनिक क्षण अनुभवले.
शाळेच्या प्राचार्या अर्चना प्रधान यांनी विद्यार्थ्याना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक आयुष्यात प्रामाणिकपणा, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा मोलाचा सल्ला दिला. तसेच संस्थेचे विश्वस्त सतिष गांधी आणि राहुल बोरा यांनीही विद्यार्थ्याना आगामी एसएससी बोर्ड परीक्षेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.
दहावीच्या विद्यार्थ्यानी आपल्या शाळेप्रती असलेली ओढ आणि कृतज्ञता म्हणून स्मृतीचिन्ह स्वरूपात एक सुंदर भेटवस्तू शाळेला प्रदान केली. या सोहळ्यासाठी संस्थेचे चेअरमन डॉ. के. के. बोरा, विश्वस्त सौ. लीलावती बोरा, सतीश गांधी, राहुल बोरा यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान कार्यक्रमाचा शेवट आनंदाश्रू आणि एकमेकांना पूरक दिलेल्या शुभेच्छांनी झाला. “कठोर परिश्रम आणि सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे, तुम्ही परीक्षेत नक्कीच उत्तुंग यश संपादन कराल,” असा विश्वास व्यक्त करत शिक्षकांनी विद्यार्थ्याना निरोप दिला. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.