रयतच्या विद्यार्थिनींनी यशाची शिखरे पादाक्रांत करावीत - अरुण कडू पाटील
◻️ सात्रळ येथे दहावीच्या विद्यार्थिनींचा निरोप आणि करिअर मार्गदर्शन सोहळा संपन्न
संगमनेर LIVE (सात्रळ) | राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींचा निरोप आणि शुभेच्छा समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त माजी प्राचार्य सर्जेराव मते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व थोर स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार कॉम्रेड पी. बी. कडू पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना अरुण कडू पाटील म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींनी नेहमी आघाडीवर असायला हवे. केवळ परीक्षेत यश मिळवणे इतकेच ध्येय न ठेवता, उत्तम व्यक्तिमत्व आणि चारित्र्य जपत आपल्या पालकांचे, शाळेचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सर्जेराव मते यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना परीक्षेचा ताण न घेता त्याला धैर्याने सामोरे जाण्याचे तंत्र सांगितले आणि करिअरच्या नियोजनाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापिका सौ. व्ही. एस. ब्राह्मणे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून विद्यार्थिनींच्या भावी आयुष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या. नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गारुडकर यांनी देखील विद्यार्थिनीना परिक्षेतील यशासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उपशिक्षक एस. पी. पलघडमल यांनीही विद्यार्थिनींना परीक्षेतील यशासाठी सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व पटवून दिले.
विद्यालयातील श्रुती शिंदे, कांचन जाधव, विद्या थोरवे आणि स्मिता पर्वत या विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त करताना शाळेत मिळालेले संस्कार आणि शिक्षकांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली, ज्यामुळे उपस्थितांचे मन भरून आले.
दरम्यान या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी सदस्य पंकज कडू पाटील, पर्यवेक्षिका श्रीमती साबळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रावणी दिघे व कु. वैष्णवी गीते यांनी केले. तर, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक जोंधळे, ठोसर आणि सर्व रयत सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.