पाझर तलावातील पाण्यामुळे रब्बी हंगामाला ‘संजीवनी' - आमदार अमोल खताळ
◻️ निळवंडेच्या पाण्याने लोहारे कासारे पाझर तलाव ओसंडला; १७८ हेक्टर शेतीला दिलासा
संगमनेर LIVE | निळवंडे डाव्या कालव्यातून कासारे येथील पाझर तलावात अखेर पाणी सोडण्यात आले असून, यामुळे लोहारे, कासारे आणि मेंढवन परिसरातील शेतकऱ्यांचा अनेक वर्षाचा वनवास संपला आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर मिळालेल्या या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटले असून, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते रविवारी पाण्याचे विधिवत पूजन करण्यात आले.
१९६६ नंतर प्रथमच या तलावात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध होण्याचा ऐतिहासिक क्षण या निमित्ताने साध्य झाला आहे. या उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे लोहारे, कासारे आणि मेंढवन परिसरातील सुमारे १७८ हेक्टर क्षेत्र थेट ओलिताखाली येणार असून, रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि भाजीपाला यांसारख्या पिकांसाठी हे पाणी खऱ्या अर्थाने ‘संजीवनी’ ठरणार आहे.
पाणी पूजनानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार अमोल खताळ भावूक झाले. ते म्हणाले की, “लोहारे, कासारे, मेंढवन हा भाग नेहमीच दुष्काळाच्या झळा सोसत आला आहे. अनेक पिढ्यांनी केवळ पावसाच्या लहरीवर शेती केली. मात्र, महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामुळे आज हा ऐतिहासिक टप्पा गाठता आल्याचे म्हटले आहे.
काथ नदीवर १९६६ मध्ये उभारण्यात आलेल्या या पाझर तलावाची एकूण साठवण क्षमता ४३.२८ दशलक्ष घनफूट आहे. मात्र, पावसाअभावी हा तलाव अनेकदा कोरडाच असायचा. यंदा विशेष प्रयत्नांमुळे तलावात २९.०३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
कार्यकारी अभियंता प्रीतम शेवाळे यांनी सांगितले की, “जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले असून, या प्रकल्पाचे सातत्य टिकवण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे.”
“या परिसराने अनेक वर्षे अवर्षण सहन केले. ज्वारी-बाजरीवर समाधान मानणाऱ्या शेतकऱ्याला आता गहू आणि भाजीपाला घेता येईल, इतका आत्मविश्वास या पाण्याने दिला आहे. चाऱ्यांची दुरुस्ती करून पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तातडीने पावले उचलत आहोत. हा भाग कायमस्वरूपी सुजलाम सुफलाम करणे हेच आमचे ध्येय आहे.” अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी यावेळी दिली.
दरम्यान निळवंडेचे पाणी तलावात आल्याने परिसरातील भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे केवळ विहिरींना पाणी येणार नाही, तर पशुधनासाठी चाऱ्याचा प्रश्नही मिटणार आहे. विखे पाटील आणि खताळ यांच्या या निर्णयाचे संपूर्ण परिसरातून स्वागत होत आहे.