‘सहकार पंढरी’ची समृध्दी पाहूण ६ हजार ७०० विद्यार्थी भारावले!
◻️ पुस्तकी ज्ञानाला सहकाराच्या प्रयोगांची जोड - बाळासाहेब थोरात
संगमनेर LIVE | ‘दुष्काळी तालुका ते राज्यातील एक अत्यंत प्रगतशील आणि वैभवशाली तालुका’ ही संगमनेरची ओळख आज केवळ कागदावर राहिलेली नसून ती नव्या पिढीच्या मनावर कोरली जात आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी लावलेल्या सहकाराच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हा ‘संगमनेर पॅटर्न’ देशाला दिशा दाखवत आहे. याच ‘सहकार पंढरी’ची समृध्दी तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यानी अनुभवली आहे.
डॉ. जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून तालुक्यातील ६ हजार ७९० शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहकारातील विविध संस्थांना भेटी दिल्या. केवळ वर्गातील चार भिंतींच्या आत शिक्षण न घेता, प्रत्यक्षात शेती, उद्योग आणि तंत्रज्ञान कसे चालते, हे जाणून घेणे या उपक्रमाचे मुख्य उद्देश होते. या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यानी थोरात सहकारी साखर कारखान्यात ऊसापासून साखर निर्मितीसह अल्कोहोल आणि वीज निर्मितीची अद्ययावत प्रक्रिया जाणून घेतली. तसेच राजहंस दूध संघात दुग्ध प्रक्रिया आणि विविध उप-पदार्थांची जागतिक दर्जाची निर्मिती कशी होते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. याचबरोबर अमृतवाहिनी शैक्षणिक संकुलातील इंजिनिअरिंग, फार्मसी, डेंटल आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील अत्याधुनिक सोयीसुविधा, अमृतवाहिनी बँक आणि शेतकी संघाचे कार्य विद्यार्थ्यांनी सविस्तरपणे अभ्यासले.
अमृत उद्योग समूहातील हिरवाई, स्वच्छ परिसर, शिस्तबद्ध आणि प्रसन्न वातावरण तसेच नूतन प्रशासकीय इमारतीचे वैभव पाहून विद्यार्थी थक्क झाले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे प्रेरणास्थळ आणि अमृतेश्वर मंदिर हे विद्यार्थ्यांसाठी ऊर्जेचे केंद्र ठरले.
याप्रसंगी विद्यार्थ्याशी संवाद साधताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी मोलाचा संदेश दिला. ते म्हणाले की, सहकारमहर्षींच्या आदर्श तत्त्वांवर आणि कष्टाळू शेतकऱ्यांच्या जोरावर संगमनेर तालुका आज उभा राहिला आहे. आपण पाईपलाईनचे जाळे आणि प्रगत शेतीच्या जोरावर समृद्ध झालो आहोत, मात्र भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी तरुण पिढीने ‘एआय’ सारखे नवीन तंत्रज्ञान अभ्यासणे काळाची गरज आहे. ही समृद्ध परंपरा पुढे नेत तरुणांनी आपल्या कुटुंबाचा व तालुक्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले.