डॉ. विखे पाटील यांनी पुन्हा स्वतः पुढाकार घेत सोडवली राहुरीत वाहतूक कोंडी!
◻️ नगर-मनमाड महामार्गावरील प्रवाशांना दिलासा
संगमनेर LIVE (सात्रळ) | अहिल्यानगरकडे जाताना राहुरी-शनिशिंगणापूर फाट्यावर निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे पाहून माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेचा परिचय दिला. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. ही परिस्थिती पाहताच डॉ. विखे पाटील यांनी आपल्या वाहनातून खाली उतरून स्वतः रस्त्यावर उतरत पुढाकार घेतला आणि काही वेळातच वाहतूक सुरळीत करून प्रवाशांना मोठा दिलासा दिला.
नगर-मनमाड या वर्दळीच्या महामार्गावर राहुरी परिसरात सध्या रस्त्याची कामे सुरू आहेत. शनिशिंगणापूर फाट्यावर कामामुळे रस्ता अरुंद झाला असून अवजड वाहनांची संख्या वाढल्याने आज प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. उष्णता आणि तासनतास अडकून पडल्यामुळे प्रवासी हवालदिल झाले होते. याच मार्गावरून जात असताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी ही परिस्थिती पाहिली आणि आपल्या ताफ्यातील सुरक्षारक्षकांसह स्वतः वाहतूक नियोजनासाठी रस्त्यावर उतरले.
यावेळी वाहतूक सुरळीत करत डॉ. विखे पाटील यांनी कोंडीत अडकलेल्या नागरिकांशी आणि विद्यार्थ्याशी संवाद साधत त्यांच्या रोजच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी प्रवाशांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, या कोंडीमुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना वेळेवर कामावर पोहोचता येत नाही, तर शाळा-महाविद्यालयीन बसेस अडकून पडल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विशेषतः रुग्णवाहिकांसारख्या आपत्कालीन सेवांनाही या कोंडीचा मोठा फटका बसत असून रुग्णांचा जीव धोक्यात येत असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
वाहतूक कोंडीची भीषणता आणि नागरिकांचा त्रास लक्षात घेऊन डॉ. सुजय विखे पाटील यांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी जड वाहनांसाठी तातडीने पर्यायी मार्गाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या, तसेच कामाच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल आणि सुरक्षारक्षक तैनात करण्याचे निर्देश दिले. महामार्गावर स्पष्ट दिशादर्शक सूचना फलक लावून रस्त्याचे काम रेंगाळत न ठेवता ते युद्धपातळीवर पूर्ण करावे, जेणेकरून भविष्यात अशा कोंडीची पुनरावृत्ती होणार नाही, अशी तंबीही त्यांनी प्रशासनाला दिली.
“विकासकामे होणे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आवश्यकच आहेत, मात्र ही कामे सुरू असताना सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात अडथळा येणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे. नागरिकांचा वेळ आणि सुरक्षा याला आमचे पहिले प्राधान्य असेल.” अशी ग्वाही डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी दिली.
दरम्यान “नेते केवळ भाषणात विकास सांगतात, पण डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आमची अडचण सोडवली, हे पाहून खूप समाधान वाटले,” अशी भावना याप्रसंगी एका त्रस्त वाहनचालकाने व्यक्त केली आहे. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.