‘दिशाहीन आणि भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प - बाळासाहेब थोरात
◻️ शिक्षण आणि आरोग्यावरील निधी कपातीमुळे गोरगरिबांचे कंबरडे मोडणार
संगमनेर LIVE | मोदी सरकारने आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशासमोरील आर्थिक आणि सामाजिक संकटांवर प्रभावी उपाय शोधण्याऐवजी अस्तित्वात असलेले प्रश्न अधिक गंभीर करणारा ठरला आहे. या अर्थसंकल्पातून गोरगरीब जनतेला कोणताही ठोस दिलासा मिळालेला नसून, वाढती महागाई आणि बेरोजगारी आटोक्यात आणण्यासाठी सरकारने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. हा अर्थसंकल्प पूर्णपणे अपयशी, दिशाहीन आणि जनतेचा भ्रमनिरास करणारा असल्याची जळजळीत टीका कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
केंद्रीय अर्थसंकल्पावर आपली सविस्तर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशामध्ये सध्या महागाई आणि बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. मात्र, या गंभीर समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडे कोणतीही ठोस कार्ययोजना दिसत नाही. ठप्प झालेली वेतनवाढ, बाजारपेठेतील कमकुवत मागणी आणि खाजगी गुंतवणुकीत आलेली मोठी मंदी ही आजच्या अर्थव्यवस्थेसमोरील प्रमुख आव्हाने आहेत.
असे असतानाही रोजगार निर्मितीसाठी किंवा सामान्य माणसाची क्रयशक्ती वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात कोणताही नाविन्यपूर्ण विचार मांडण्यात आलेला नाही. उलट, वाढता कर्जबोजा आणि सातत्याने घसरणारा रुपया यांसारख्या गंभीर आर्थिक बाबींकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
शिक्षणापासून आरोग्यापर्यंत आणि सामाजिक न्यायाच्या विविध योजनांसाठी असलेल्या निधीत कपात करण्यात आल्याने समाजातील वंचित घटकांचे मोठे नुकसान होणार असल्याचेही थोरात यांनी नमूद केले. गोरगरिबांच्या कल्याणासाठी कोणतीही विशेष तरतूद या अर्थसंकल्पात दिसून येत नाही.
थोरात यांनी पुढे असेही म्हटले की, हा अर्थसंकल्प म्हणजे एका थकलेल्या आणि पूर्णपणे दिशाहीन झालेल्या सरकारचा जिवंत दाखला आहे. अर्थसंकल्पीय भाषणात केवळ मोठ-मोठे आकडे फेकून जनतेला भुलवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु प्रत्यक्षात जनहिताचा किंवा सर्वसमावेशक विकासाचा कोणताही विचार यामध्ये करण्यात आलेला नाही. अशी तोफ डागली आहे.