‘रोखठोक राजकारण अन् वेळेचे नियोजन’ हेचं ‘अजितदादा’च्या लोकप्रियतेचे गमक!'
◻️ संगमनेरच्या शोकसभेत डॉ. विखे पाटील यांनी दिले ‘अजितदादां’च्या शिस्तीचे दाखले
संगमनेर LIVE | “राजकारणात रोखठोक स्वभाव कधीकधी अडचणीचा ठरू शकतो, मात्र अजितदादांनी याच रोखठोकपणातून जनतेच्या मनात अढळ स्थान आणि लोकप्रियता मिळवली आहे,” अशा शब्दांत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.
संगमनेर येथे आयोजित शोकसभेत बोलताना त्यांनी अजितदादांच्या शिस्तीचे आणि विकासवादी राजकारणाचे दाखले दिले.
डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की, “अजितदादांच्या कामाची पद्धत ही अत्यंत शिस्तबद्ध होती. ते वेळेचे प्रचंड पक्के होते; त्यांनी कधीही आपली वेळ चुकवली नाही. मग तो सकाळचा कार्यक्रम असो किंवा रात्रीची बैठक, वेळेचे नियोजन कसे करावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.”
राजकारणातील वैचारिक मतभेदांवर भाष्य करताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “राजकीय पटलावर मतभेद असणे स्वाभाविक आहे, परंतु जेव्हा विषय जनतेच्या विकासाचा येतो, तेव्हा सर्व मतभेद बाजूला सारून एकत्र यायचे, हा अजितदादांचा मंत्र आहे. आजच्या तरुण पिढीने राजकारणात येताना हाच ‘विकासमंत्र’ जोपासला पाहिजे.”
अजितदादांच्या राजकीय प्रवासाचे विश्लेषण करताना डॉ. विखे पाटील यांनी नमूद केले की, त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि कामाचा प्रचंड उरक हीच त्यांची खरी ताकद होती. प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि जनहिताच्या कामांसाठी असलेली तळमळ ही नव्या राजकीय पिढीसाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे.
केवळ राजकीय संघर्षात न अडकता, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजकारणात कसे टिकून राहावे, याचे मार्गदर्शन दादांच्या या कार्यपद्धतीतून मिळते. राजकीय सीमा ओलांडून केवळ विकासासाठी एकत्र येण्याची ही वृत्ती लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद करताना श्रध्दांजली अर्पण केली.