आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते धांदरफळ खुर्द येथे शिबिराचा शुभारंभ
◻️ आता दाखल्यांसाठी शहरात जाण्याची गरज नाही; 'महसूल समाधान शिबिर' जनतेच्या दारी!
संगमनेर LIVE | महायुती सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेला अधिक व्यापक करत, ग्रामीण भागातील जनतेचा वेळ आणि कष्ट वाचवण्यासाठी आता ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. या शिबिरामुळे नागरिकांना विविध दाखल्यांसाठी संगमनेर शहराच्या वारंवार चकरा मारण्याची गरज उरणार नाही, असा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित या शिबिराचे उध्दघाटन आमदार खताळ यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी त्यांनी विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्याना थेट दाखल्यांचे वाटपही केले.
कार्यक्रमात बोलताना आमदार खताळ यांनी स्पष्ट केले की, जनतेची सोय हीच सरकारची प्राथमिकता असून पूर्वी दाखल्यांसाठी होणारी धावपळ थांबवण्यासाठी आता थेट गावागावात प्रशासकीय सेवा पुरविल्या जात आहेत. विशेषतः शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवत सरकारने आता शाळा आणि महाविद्यालयांमधूनच दाखले देण्याचा उपक्रम सुरू केला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्याची मोठी अडचण कायमची दूर झाली आहे.
यासोबतच बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यतची कर्जमाफी लागू केली असून साडेसात एचपीपर्यंतच्या वीजपंपांचे वीजबिल माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागाच्या सर्वागीण विकासासाठी हजार लोकसंख्येच्या गावांना जोडणारे सुमारे २९ हजार किलोमीटरचे रस्ते सिमेंट काॅक्रीटचे करण्याची घोषणा करण्यात आली असून, त्यासाठी २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संगमनेर तालुक्याच्या विकासाचा लेखाजोखा मांडताना आमदार खताळ म्हणाले की, तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर पहिल्यांदाच कृषी विभागामार्फत ९०० ट्रॅक्टरचे विक्रमी वाटप करण्यात आले आहे. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत ९२ लाख रुपयांची मदत देण्यात आली असून, पीएम किसान व नमो शेतकरी योजनांच्या माध्यमातून तब्बल ११.८० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात महसूल विभागात निर्माण झालेली अकार्यक्षमता दूर करून महायुती सरकारने या विभागाला अधिक लोकभिमुख आणि कार्यक्षम केले आहे. लवकरच औद्योगिक वसाहतीची अधिसूचना काढून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान याप्रसंगी प्रांताधिकारी अरुण उंडे, वनविभागाचे उपवनसंरक्षक अमरजीत पवार, उपविभागीय कृषि अधिकारी अक्षय गोसावी, तहसीलदार धीरज मांजरे, तालुका कृषि अधिकारी रेजा बोडके, सरपंच लता खताळ, भाजपचे अशोक कानवडे, शिवसेनेचे मीनानाथ शेळके, दिलीप कोल्हे, डॉ. महेंद्र कोल्हे, अण्णासाहेब गोडसे, भाऊसाहेब खताळ, मीनानाथ खताळ, अतुल खताळ, सागर खताळ, हरीश वनवे, भागवत कानवडे, साहेबराव वलवे, नितीन खताळ, सतीश कोकणे, उमेश कोकणे, मिलिंद खताळ यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान या शिबिरामुळे धांदरफळ खुर्द आणि परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, प्रशासकीय कामांसाठी होणारा त्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.