राहुरी येथील खंडोबा यात्रेपूर्वी नगर-मनमाड महामार्गाचे काम पूर्ण करा!
◻️ डॉ. सुजय विखे पाटलांनी भल्या पहाटे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कामाचा घेतला आढावा
राहुरी LIVE | राहुरी शहराचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबा महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर, नगर-मनमाड राज्य महामार्गाचे रखडलेले काम तातडीने मार्गी लावण्यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज शुक्रवारी सकाळी सात वाजता विखे पाटील यांनी राहुरीत हजेरी लावत सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित ठेकेदाराला कामाचा दर्जा व वेग वाढवण्याच्या कडक सूचना दिल्या.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज भल्या पहाटे सात वाजेच्या सुमारास राहुरीत दाखल होत या कामाचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील खंडोबा यात्रेनिमित्त होणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता, या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. ग्रामदैवत खंडोबा महाराजांचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा थेट रस्त्यावरील कामाकडे वळवला. अनेक वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या महामार्गाच्या कामाला आता विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे गती मिळाली असून, यात्रेपूर्वी रस्ता वाहतुकीसाठी सुयोग्य करण्यावर त्यांचा विशेष भर आहे.
राहुरीच्या या ऐतिहासिक यात्रेचे महत्त्व मोठे असून, अपूर्ण रस्त्यामुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ठेकेदाराने युद्धपातळीवर काम करावे, असे निर्देश विखे पाटील यांनी दिले आहेत. “लोकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी रस्ता वेळेत पूर्ण होणे ही प्रशासनाची आणि आमची प्राथमिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान याप्रसंगी दादा पाटील सोनवणे, नगरसेवक अरुण साळवे, राजेंद्र उंडे, अमोल काशीद, नंदकुमार डोळस, सचिन मेहत्रे, अजित डावखर, नरेंद्र शेटे, सुजय काळे, युवराज गाडे, दिनेश उंडे, संतोष बर्डे, जितू बर्डे, शांताराम शेटे, सुरेश भुजाडी, कारभारी डौले, सचिन भोंगळ, राजेंद्र वराळे, ठेकेदार महेश गायकवाड, संपर्क अधिकारी मनोज गव्हाणे आदी उपस्थित होते.
दरम्यान अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या बहुचर्चित रस्त्याचा प्रश्न गांभीर्याने मार्गी लावल्याबद्दल राहुरीच्या नागरिकांकडून डॉ. सुजय विखे पाटील यांचे विशेष आभार मानले जात आहेत. रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे जात असल्यामुळे केवळ वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही, तर अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने आणि तत्परतेने काम करणारे नेतृत्व म्हणून विखे पाटील यांच्या कार्याचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.