संगमनेर तालुक्यातील रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी ३१ कोटींचा निधी मंजूर
◻️आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्याचे दळणवळण गती मान होणार!
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी आणि दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातून ३१ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विकासासाठी २५ कोटी आणि वेल्हाळे ते राजापूर दरम्यान म्हाळुंगी नदीवर भव्य पुलाच्या बांधकामासाठी ६ कोटी रुपयांचा समावेश असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे.
या निधीच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या रस्ते विकास कामांना गती मिळणार आहे. यामध्ये वेल्हाळे ते राजापूर म्हाळुंगी नदीवरील पुलासह कोकणगाव ते मांची घाट, सुकेवाडी ते राष्ट्रीय महामार्ग ५०, चिंचेवाडी-साकूर ते मारुती मंदिर आणि अकोले नाका शारदा शाळा ते तीन बत्ती चौक या मार्गाचे नूतनीकरण करण्यात येईल.
तसेच निमगाव बुद्रुक, राजापूर, जोर्वे नाका ते निंबाळे चौफुली, नान्नज दुमाला ते पारेगाव बुद्रुक, निमगाव टेंभी ते शिरापूर, जोर्वे ते वडगाव पान, कवठे कमळेश्वर ते लोहारे, झोळे ते नांदुरी दुमाला या ग्रामीण भागातील जोड रस्त्यांचाही विकास केला जाणार आहे. वाघापूर ते जिल्हा महामार्ग (डिग्रस - अंभोरे), चिकणी ते डोंगरगाव, हिवरगाव पठार ते जिल्हा महामार्ग तसेच कोकणगाव ते डोंगरे वस्ती व नवले वस्ती या शिवार आणि वस्ती रस्त्यांच्या कामांमुळे शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.
या निधीमुळे तालुक्यातील रस्त्यांची कामे आता जोमाने सुरू होतील, ज्यामुळे वाहतुकीला गती मिळून शेतमाल बाजारपेठेत नेणे सोपे होईल. शालेय विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. “ग्रामीण भागातील विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. असे आमदार खताळ यांनी सांगितले.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा निधी मिळाला असून, आगामी काळातही उर्वरित विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन,” असा विश्वास देखील आमदार अमोल खताळ यांनी यावेळी व्यक्त केला आहे.