भंडारदरा शताब्दी महोत्सव पर्यटकांना आकर्षित करणारा ठरावा - मंत्री विखे पाटील
◻️ विधान भवनातील बैठकीत घेतला आराखड्याचा आढावा
संगमनेर LIVE (लोणी) | भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष सांस्कृतिक आणि निसर्ग पर्यटनातून साजरे होण्याच्या दृष्टीने सर्वंकष कृती आराखडा तयार करावा, वर्षभर संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात स्थानिक कलाकारांना संधी आणि रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न व्हावेत, अशा सुचना जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष सुरू आहे. यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शताब्दी महोत्सव समिती स्थापन केली आहे. धरणाचे शताब्दी वर्ष जलायश परीसराचे सुशोभीकरण करून सांस्कृतिक व पर्यटन विकासातून साजरे करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने विशेष आराखडा तयार केला आहे. सदर आराखडा अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर करून त्यास मान्यता घेणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत तयार करण्यात आलेल्या आराखड्याचा आढावा घेण्यात आला. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे, स्वप्निल काळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष हे जिल्ह्याकरीता ऐतिहासिक आहे. या धरणामुळे जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक क्षेत्रामध्ये झालेले परिवर्तन खुप मोठे असल्याने हे शताब्दी वर्ष सामाजिक भावनेतून साजरे व्हावे ही संकल्पना विभागाची आहे. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने स्वतंत्र लोगो तयार करण्यात यावा, प्रत्येक महिन्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करुन वर्षभर हा महोत्सव साजरा होण्याच्या दृष्टीने सांस्कृतीक उपक्रमांचे आयोजन करावे. यामध्ये स्थानिक कलाकारांनाही संधी द्यावी. लोककलेचे महत्वही या निमित्ताने आधारेखित होईल. पर्यटक आकर्षित होतील असे पाण्यावर आधारित कार्यक्रमाचे नियोजन करावे अशा सुचना त्यांनी बैठकीत दिल्या.
भंडारदरा धरणामुळे उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेले परिवर्तन हे खुप मोठे आहे. धरणाच्या निर्मितीमुळे जिल्ह्याचा विकास होवून त्याला स्थैर्य मिळाले. हा झालेला बदल सादरणीकरणाच्या माध्यमातून पुन्हा नव्या पिढीपुढे यावा अशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली. धरणापासून ते अंतीम चारी पर्यत या सर्व कार्यक्रमांची व्याप्ती असावी. धरणाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने स्वतंत्र वेबसाईट तयार करुन, समाज माध्यमातून या शताब्दी वर्षाची प्रसिध्दी आणि प्रचार व्हावा अशा सुचनाही मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिल्या.