एकवीरा फाउंडेशनच्या क्रीडा महोत्सवात ५ हजार महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
◻️ महिला दिनी मैदानावर षटकार-चौकारांची आतषबाजीत रंगला ‘ती’चा आनंद सोहळा
संगमनेर LIVE | प्रत्येक कुटुंबाच्या आणि राज्याच्या विकासाचा कणा असलेल्या महिलांनी आज खेळाच्या मैदानात आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे ‘एकवीरा फाउंडेशन’च्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा महोत्सवात संगमनेर तालुक्यातील सुमारे ५,३२७ महिलांनी सहभाग नोंदवत ‘आम्ही कुठेही कमी नाही’ हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
या महोत्सवात क्रिकेट, रस्सीखेच आणि बॅडमिंटन या खेळांना महिलांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. मैदानावर दररोज २२ क्रिकेट सामने आणि ३० रस्सीखेच सामने खेळले जात आहेत. विशेष म्हणजे, केवळ युवतीच नव्हे तर वयोवृद्ध आजींनीही या स्पर्धेत सहभागी होऊन तरुणाईला लाजवेल असा उत्साह दाखवला. जेव्हा एखादी महिला फलंदाज षटकार किंवा चौकार मारते, तेव्हा संपूर्ण मैदान जल्लोषाने आणि टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून जात होता.
नेहमी शेतीकामात आणि घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असणाऱ्या महिलांसाठी हा महोत्सव एक आनंदाची पर्वणी ठरला आहे. या निमित्ताने महिला आपल्या आरोग्याप्रति जागरूक होत असून, खेळाच्या माध्यमातून नवीन मैत्रिणींशी नातं जोडत आहेत. डीजेच्या तालावर होणारा जल्लोष महिलांना मानसिक विरंगुळा आणि नवी ऊर्जा देणारा ठरत आहे.
यावेळी बोलताना एकवीरा फाउंडेशनच्या डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या “लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून केवळ खेळच नाही, तर आरोग्य, आहार, वाचन आणि बचत गट यांसारख्या विषयांवरही चर्चा होत आहे. ही ऊर्जा नवीन पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल.”
तसेच, “ग्रामीण भागातील महिलांना डॉ. जयश्रीताई थोरात यांनी एवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे, हे पाहून आनंद वाटतो. संगमनेरच्या महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. मलाही यापुढे महिला सबलीकरणासाठी अधिक जोमाने काम करण्याची इच्छा आहे.” अशा भावना युपीएससी उत्तीर्ण ऋतुजा गायकवाड यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या आहेत.