विखे पाटील परिवार अन् शासन एकल महिलांच्या पाठीशी - सौ. शालिनीताई विखे
◻️ राहाता येथे एकल महिलांसाठी आरोग्य शिबिर व रोजगार मेळावा संपन्न
संगमनेर LIVE (राहाता) | “महिला हा कोणत्याही कुटुंबाचा आणि समाजाचा मुख्य कणा आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः एकल महिलांनी संघर्षाच्या काळात स्वतःला कधीही एकटे समजू नये, कारण त्यांच्या पाठीशी विखे पाटील परिवार आणि शासन खंबीरपणे उभे आहे. अहिल्यानगर जिल्ह्याने एकल महिलांच्या प्रश्नावर राज्यात खऱ्या अर्थाने एक नवा आणि आदर्श पायंडा पाडला आहे, याचा आम्हाला मोठा अभिमान आहे," असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
आरसीएफ, जगदंबा फाउंडेशन, साऊ एकल महिला समिती (अहिल्यानगर) आणि पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने राहाता येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी व जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या मेळाव्याच्या माध्यमातून एकल महिलांसाठी आरोग्य शिबिर, रोजगार मार्गदर्शन, मोफत कडधान्य वाटप आणि अपघात विमा वितरण असे महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आले.
यावेळी बोलताना सौ. विखे पाटील यांनी नमूद केले की, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे नेहमीच उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. महिलांना केवळ बचतीची सवय न लावता, त्यांना विविध कौशल्य प्रशिक्षण देऊन व्यावसायिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने काम सुरू आहे. “तुमच्या एका हाकेवर मी मदतीला सदैव तयार आहे,” असा विश्वास ही त्यांनी यावेळी महिलांना दिला.
कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्यात एकल महिलांचा पहिला अधिकृत सर्वे विखे पाटील यांच्या पुढाकारानेच यशस्वी झाला. विशेषतः चौंडी येथील मंत्रिमंडळ बैठकीत नामदार विखे पाटील यांनी हा प्रश्न आग्रहाने मांडला होता. कोविडच्या कठीण काळातही सौ. शालिनीताईनी या महिलांना मोठा आधार दिला असून, त्यांनी भविष्यातही या चळवळीचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
याच अनुषंगाने बोलताना समन्वयक मिलिंदकुमार साळवे यांनी माहिती दिली की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आता संपूर्ण राज्यस्तरावर एकल महिलांचा सर्वे केला जाणार असून, त्याद्वारे महिलांसाठी अधिक व्यापक व शाश्वत योजना कार्यान्वित होतील. असा विश्वास व्यक्त केला.
या मेळाव्याला जिल्हा अध्यक्ष अशोक कुटे, गट विकास अधिकारी विवेक गुंड, गणेश लंघे, राजेश पावसे, रामदास गंभीरे, प्रकाश जोंधळे, डॉ. संजय उबाळे, नारायण जाधव, अरुण मोकळ, संगीता मालकर, प्रतिभा कुलकर्णी यांच्यासह राहाता तालुक्यातील एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दरम्यान या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अशोक कुटे यांनी समितीच्या कार्याचा आढावा घेतला, तर सूत्रसंचालन अरुण मोकळ यांनी केले आणि उपस्थितांचे आभार नारायण जाधव यांनी मानले.