आश्वी येथे आचार्य आनंद ऋषीजींच्या पुण्यतिथीनिमित्त ४५ दात्यांचे रक्तदान!
संगमनेर LIVE | संयम, त्याग आणि करुणेचे मूर्तिमंत प्रतीक राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजीं महाराज यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे जैन धर्म स्थानकात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हा संदेश देत ४५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली.
उडान टीम व जैन श्रावक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. २८) आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला युवक-युवतींसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात अनेक तरुणांनी प्रथमच रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. या उपक्रमातून ४५ रक्तपिशव्या संकलित करून गरजू रुग्णांसाठी मोलाची मदत केली.
सामाजिक कार्यासोबतच अध्यात्मिक विचारांची जोड देत ‘आनंद गुणगौरव’ कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भाविकांनी एकत्रितपणे आनंद चालीसा पठण केले आणि विश्वशांतीच्या संकल्पासाठी नवकार महामंत्राचा सामूहिक जप केला. यामुळे संपूर्ण जैन धर्म स्थानकाचा परिसर भक्तीमय आणि भावपूर्ण वातावरणाने न्हाऊन निघाला होता.
दरम्यान हा सोहळा यशस्वी करण्यासाठी भूषण भंडारी, रोशन रातडीया, युग लुंकड, अथर्व रातडीया, संयम लुंकड, प्रित गांधी, शुभ बोरा, महिमा रातडीया, जिनेशा गांधी, प्रसन्ना रातडीया, अमिता भंडारी, दिया लुंकड, दिया गांधी, भक्ती भंडारी, अनिकेत पटवा, श्रेणीक बोरा, सौरभ भंडारी आदींनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी जैन समाजातील श्रावक-श्राविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.