शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनचं रेल्वे अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावेत - मंत्री विखे पाटील
◻️ पुणतांबा-शिर्डी आणि राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाबाबत मंत्रालयात बैठक संपन्न
संगमनेर LIVE (लोणी) | राहुरी-शनिशिंगणापूर तसेच पुणतांबा-शिर्डी रेल्वे मार्गाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील निर्णय करावेत, असे निर्देश जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
जिल्ह्यातील विविध रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह पुणतांबा, राहाता आणि राहुरी तालुक्यातील शेतकरी तसेच रेल्वे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पुणतांबा-शिर्डी रेल्वे मार्गाच्या संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देवून शेतकऱ्यांचा शेतात जाण्यासाठीचा मार्ग बंद होणार नाही याची दक्षता घ्यावी. यापुर्वी शेतकऱ्यांनी जमीनी दिल्या म्हणूनच रेल्वे प्रकल्प मार्ग लागला त्यामुळे शेतकऱ्यांवर आता अन्याय करणे उचित नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना विश्वासात घेवून निर्णय करावेत. शेतात जाण्याचे मार्ग बंद होणे योग्य नाही. शेतकऱ्यांचे सायपन अधिकृत करून देणे, अंडरपास मंजूर करण्यासंदर्भात तसेच पुणतांबा-शिर्डी मार्गावरील गाड्यांना पुणतांबा जंक्शनवर थांबा देण्याच्या मागणी संदर्भात बैठकीत चर्चा होवून याबबात रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकारत्मक निर्णय करण्याचे निर्देश देण्यात आले.
राहुरी-शनिशिंगणापूर प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी काही गावातील जमीनीच्या संपादन प्रक्रीयेबाबत शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवले, आहेत. भूसंपदानामुळे काही भागात जमीनीची विभागणी होत आहे. यापुर्वी विद्यापीठ तसेच मुळा धरणासाठी शेतकऱ्यांनी जमीनी दिल्या आहेत. आता रेल्वे प्रकल्पासाठी अधिक भूसंपादन झाल्यास शेतकरी भूमीहीन होईल. अशी बाब उपस्थित शेतकऱ्यांनी मांडल्याने याबबात रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी फार घाईने निर्णय न कराता शेतकऱ्यांच्या भावना विचारात घेवून निर्णय करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.