ग्रामीण विकासासाठी संशोधनाकडे डोळसपणे पहावे - सौ. शालिनीताई विखे
◻️ पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात ‘मटेरियल सायन्स’वर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
संगमनेर LIVE (लोणी) | “विज्ञान आणि तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे आणि सातत्यपूर्ण संशोधनामुळे भारत देश विकसित होत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाचा उपयोग ग्रामीण भागातील आरोग्य, शेती आणि सर्वागीण विकासासाठी होणे काळाची गरज आहे. त्यासाठी संशोधनाकडे डोळस बुद्धीने बघण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजना आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र संशोधन केंद्राच्या वतीने ‘इनोव्हेशन इन मटेरियल सायन्स’ विषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर कर्नाटक केंद्रीय विद्यापीठाचे डॉ. शेषराव भोसले, बी. जे. कॉलेजचे डॉ. रमेश भिसे, संशोधक डॉ. गोस्वामी, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, उपप्राचार्य डॉ. आर. ए. पवार आणि रसायनशास्त्र विभागाचे समन्वय डॉ. बी. के. उफाडे आदि उपस्थित होते.
यावेळी शालिनीताई विखे पाटील यांनी नमूद केले की, आज विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जगात मोठी क्रांती झाली असून या प्रगतीचा थेट लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यत पोहोचायला हवा. संशोधनातील चांगल्या गोष्टी आत्मसात करून आपण देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवूनच ज्ञानाची क्षितिजे विस्तारत न्यावीत, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. शेषराव भोसले यांनी प्रवरेतील शैक्षणिक उपक्रमांचा गौरव करताना सांगितले की, मटेरियल सायन्स (पदार्थ विज्ञान) मधील नावीन्य हे प्रगत तंत्रज्ञान, शाश्वत ऊर्जा आणि आरोग्यसेवेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नॅनोमटेरियल्स, स्मार्ट मिश्रधातू आणि बायो-बेस्ड साहित्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स, उत्पादन आणि वैद्यकीय क्षेत्रांत मोठी क्रांती घडत आहे. हे क्षेत्र प्रगत भविष्य घडवण्यासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. प्रदीप दिघे यांनी प्रास्ताविकातून चर्चासत्राचा उद्देश विशद केला, तर डॉ. आर. ए. पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शोधनिबंध स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी व प्रा. ए. एस. विखे यांनी केले, तर आभार डॉ. बी. के. उफाडे यांनी मानले. या कार्यशाळेला विविध भागांतील संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.