अधिस्वीकृती समितीच्या माध्यमातून पत्रकारांना न्याय मिळावा - ना. विखे पाटील

संगमनेर Live
0
अधिस्वीकृती समितीच्या माध्यमातून पत्रकारांना न्याय मिळावा - ना. विखे पाटील
◻️ शिर्डी येथे राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे उदघाटन


संगमनेर LIVE (​शिर्डी) | माध्यमांची विश्‍वासार्हता व महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी पत्रकारांचे योगदान महत्वपूर्ण असले तरी, वर्षानुवर्ष या क्षेत्रात काम करणाऱ्या जिल्हा व ग्रामीण पातळीवरील पत्रकारांची झालेली उपेक्षा दूर करण्यासाठी अधिस्वीकृती समितीने महत्वपूर्ण भूमिका बजवावी. समितीने केलेल्या शिफारसीसाठी आपण निश्चित पाठपुरावा करू, आशी ग्वाही  जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

​महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय बैठकीचा शुभारंभ आज शिर्डी येथे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. ​या बैठकीस राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी, माहिती संचालक तथा समितीचे सदस्य सचिव डॉ. गणेश मुळे, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, समिती सदस्य नाशिक विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे आदी उपस्थित होते.

​डॉ. विखे पाटील म्हणाले, सध्याच्या बदलत्या प्रवाहात सोशल मीडिया व डिजिटल माध्यमांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे; तरीही मुद्रित माध्यमांचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही. पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी अधिस्वीकृती समिती करत असलेल्या प्रयत्नाचे त्यांनी विशेष कौतुक केले. पत्रकारांचे निवृत्तीवेतन, त्यांचे स्थैर्य आणि त्यांच्यावरील व्यावसायिक दबाव यांसारख्या अत्यंत कळीच्या प्रश्नांवर समितीच्या शिफारशींनुसार शासन निश्चितच सकारात्मक पावले उचलेल, अशी ग्वाही देत त्यांनी समितीच्या कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.

​राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी आपल्या मनोगतात विखे कुटुंबीयांच्या राजकीय व संस्थात्मक कार्याचा गौरव केला. या आदर्श कार्यपद्धतीवर आधारित मार्गदर्शक ‘संदर्भ ग्रंथ' तयार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समितीच्या कामकाजाबाबत माहिती देतांना  ते म्हणाले, राज्यभरातील सुमारे सव्वातीन हजार पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्याची कार्यवाही समितीमार्फत केली जाते. तथापि, समितीचे काम केवळ पत्रिका मंजुरीपुरते मर्यादित नसून, विविध वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे व पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून ‘पत्रकारांचे कल्याण साध्य करणे’ हे समितीचे प्रमुख ध्येय आहे. पत्रकारांच्या हितासाठी शासनाकडे योग्य शिफारशी करून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी भविष्यातही सर्वांचे सहकार्य लाभेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

गोरक्ष गाडीलकर यांनी यावेळी साईबाबा संस्थानच्या सेवाभावी कार्य व उपक्रमांविषयी माहिती दिली. ​बैठकीच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व कोकण विभागाच्या उपसंचालक दिवंगत अर्चना शंभरकर यांच्या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

दरम्यान राज्य अधिस्वीकृती समितीचे कार्यालयीन कामकाज पाहणारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधीक्षक संजय महाले हे पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त समितीचे अध्यक्ष यदु जोशी व माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !