संगमनेरचा पीकविमा प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडल्याने आमदार खताळ आक्रमक
◻️ मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांकडे तातडीने केली मदतीची मागणी
संगमनेर LIVE | खरीप हंगाम २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. महसूल आणि कृषि विभागाने पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर केला असला, तरी तालुक्यातील हजारो पात्र शेतकरी अद्याप पीकविमा भरपाईपासून वंचित आहेत. या गंभीर प्रश्नावर आमदार अमोल खताळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच शेतकऱ्यांवर ही वेळ ओढवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आमदार खताळ यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये विमा रक्कम जमा झाली असताना, केवळ संगमनेर तालुक्यातील शेतकरीच का डावलले जात आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पंचनामे पूर्ण होऊनही विमा रक्कम न मिळण्यामागे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची उदासीनता कारणीभूत असून, यामुळे नैसर्गिक आपत्तीने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेऊन प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी आणि सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात विमा रक्कम तातडीने जमा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार खताळ यांनी केली आहे.
दरम्यान, पीकविमा प्रश्नावर काही घटक राजकारण करून स्वतःचा फायदा शोधत असल्याचा आरोप करत, आपण शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सातत्याने आवाज उठवत राहू आणि हा लढा अधिक तीव्र करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“मी सातत्याने विधानसभेत आणि शासन स्तरावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत आलो आहे. मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्याकडे पाठपुरावा करूनही काही अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा तातडीने मिळालाच पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. काहीजण या विषयावर राजकारण करत असले, तरी मी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.” असे आमदार अमोल खताळ म्हणाले आहेत.