आमदार अमोल खताळ यांनी सानप कुटुंबीयांची घेतली सांत्वन पर भेट!
◻️ तिगाव येथील घटनेनंतर प्रशासनाला तात्काळ मदतीचे निर्देश
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. महेश गोरक्षनाथ सानप (वय १८) आणि ओंकार गोरक्षनाथ सानप (वय १४) अशी या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत. शुक्रवारी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी शनिवारी दुपारी तिगाव येथे धाव घेतली. सानप कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले आणि “या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण तुमच्या पाठिशी आहोत,” अशी ग्वाही दिली. तसेच शासन स्तरावरून मिळणारी आर्थिक मदत आणि विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी आमदार खताळ यांनी तहसीलदार धीरज मांजरे यांच्याशी चर्चा करून घटनेची सविस्तर माहिती घेतली. तत्काळ पंचनामा पूर्ण करून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर सरकारी मदत मिळवून द्यावी, असे निर्देश प्रशासनाला दिले. या प्रसंगी ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार अमोल खताळ म्हणाले की, “दगड खाणी, तलाव किंवा खोल पाण्याच्या ठिकाणी खोलीचा आणि तळाचा अंदाज नसतो. मुलांनी अशा धोकादायक ठिकाणी जाणे पूर्णपणे टाळावे. उन्हाळ्याच्या दिवसांत मुले पोहण्यासाठी बाहेर पडतात, तेव्हा पालकांनी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि त्यांना सुरक्षिततेबाबत सतत जागरूक करणे ही काळाची गरज आहे. भविष्यात अशा दुःखद घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे महत्त्वाचे आहे.”