माळेवाडी-शिबलापूर येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा बेपत्ता!
◻️ आश्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील माळेवाडी-शिबलापूर शिवारातून एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. सिध्दांत संजय पवार असे या बेपत्ता मुलाचे नाव असून, त्याला एखाद्या अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मंगल संजय पवार यांनी तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, सिध्दांत हा लहानपणापासूनच काहीसा मंदबुध्दीचा आहे. १५ मे २०२६ रोजी वडिलांनी त्याला खिशात तंबाखूची पुडी सापडल्यामुळे रागावून एक चापट मारली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, १६ मे रोजी सकाळी सिध्दांत नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या घेऊन रानात गेला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यत तो घरी परतला नाही.
पालक मजुरीवरून परतल्यानंतर सिध्दांत घरी नसल्याचे पाहून त्यांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील शिबलापूर, अकोले, संगमनेर, घोटी, इगतपुरी अशा विविध ठिकाणी त्याचा शोध घेतला. परंतु, त्याचा कोठेही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय आईने व्यक्त केला आहे.
बेपत्ता सिध्दांतची उंची ५ फूट, रंग सावळा आणि बांधा जाड आहे. त्याने अंगात लाल रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची फुल जीन्स पॅन्ट आणि पायात चप्पल घातली आहे. या वर्णनाचा मुलगा कोणालाही आढळल्यास किंवा त्याच्याबद्दल काही माहिती मिळाल्यास, नागरिकांनी तात्काळ आश्वी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, याप्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७ (२) प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे.