आश्वी खुर्द येथील वाड्या-वस्त्यांवर राजहंस दूध संघाकडून पाणीपुरवठा
◻️ नैसर्गिक संकटकाळात बाळासाहेब थोरात यांच्या सर्वोतोपरी मदतीच्या सूचना
संगमनेर LIVE | बुधवारी (दि. १३) संगमनेर तालुक्यात अचानक आलेल्या मान्सूनपूर्व वादळी वाऱ्याने आणि पावसाने आश्वी खुर्द परिसराला मोठा तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीत अनेक ठिकाणी महाकाय झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडल्याने संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला होता.
वीज नसल्याने गावातील पाणी उपसा यंत्रणा आणि जलवाहिन्या ठप्प झाल्या होत्या, परिणामी ऐन उन्हाळ्यात नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने संकटकाळात आश्वी ग्रामस्थांना मदतीच्या सूचना दिल्या.
विजेअभावी पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती गावातील शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यानी बाळासाहेब थोरात यांना कळवली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बाळासाहेब थोरात आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांनी तातडीने ‘राजहंस दूध संघा’तील अधिकाऱ्यांना आश्वी खुर्दमध्ये पाण्याचे टॅकर पाठवण्याच्या सूचना दिल्या.
गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे सलग तीन दिवस गावातील ज्या भागात पाण्याची गरज आहे, अशा सर्व वाड्या आणि वस्त्यांवर राजहंस दूध संघाच्या टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जोपर्यत सर्वकाही पुर्ववत होत नाही, तोपर्यत पाणीपुरवठ्यासह इतर मदत देण्याची ग्वाही ग्रामस्थांना थोरात यांनी दिली आहे.
दरम्यान, प्रत्येक कुटुंबाला आणि गरजू वस्तीला पुरेसे पाणी मिळावे यासाठी शेतकरी विकास मंडळाचे ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्ते भर उन्हात आणि रात्री विशेष परिश्रम घेत आहेत. आपत्तीच्या काळात कार्यकर्त्यानी दाखवलेली संवेदनशीलता आणि नियोजन यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत.