कॉग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांकडून सपकाळाना पाहुणचार - आमदार खताळ
◻️ कॉग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या संगमनेर दौऱ्यावर आमदाराची घणाघाती टिका
संगमनेर LIVE | महायुती सरकारवर आरोप करण्यापेक्षा अहिल्यानगर जिल्ह्यात कॉग्रेस पक्ष संपविण्यात धन्यता मानणाऱ्यांना आधी जाब विचारावा, अशा शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पलटवार केला. सपकाळ यांच्या संगमनेर दौऱ्याच्या निमित्ताने आमदार खताळांनी कॉग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि अस्तित्वावर थेट निशाणा साधला आहे.
आमदार खताळ म्हणाले की, “ज्यांनी पक्षाने मोठी पदे देऊन मोठे केले, त्यांनीच अहिल्यानगर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत कॉग्रेस संपविली. नाशिक पदवीधर निवडणूक असो किंवा नगरपालिका निवडणुका, कॉग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचाच पाहुणचार सपकाळ घेत आहेत. हा निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय आहे.” कॉग्रेसमधील अराजकतेवर त्यांनी सडकून टीका केली.
देशाच्या प्रगतीवर भाष्य करताना खताळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रभावी नेतृत्वाखाली भारत प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्रात महायुती सरकार लोकहिताचे निर्णय घेत असून, ३० जूनपूर्वी कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना नवीन भांडवल उपलब्ध होईल आणि बाजारपेठेत तेजी येईल. सरकार शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्णपणे तत्पर आहे.
पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या तुटवड्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हा तुटवडा केवळ काही लोकांच्या साठेबाजीमुळे निर्माण झालेला कृत्रिम टंचाई आहे. सर्वसामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी सरकार प्रयत्नशील असताना, विरोधक मात्र अराजकतेचे वातावरण निर्माण करून जनतेला वेठीस धरत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
राजकीय द्वेषापोटी होणाऱ्या आरोपांकडे दुर्लक्ष करून केवळ विकासकामे आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर आपला भर असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. आगामी काळात संगमनेर मतदारसंघात विकासाचा सकारात्मक बदल नक्कीच दिसून येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.