संगमनेर महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे पत्रकारिता निकालात सुयश!
◻️ भगवान अहिरे प्रथम, ॲड. राजू खरे द्वितीय तर, अफसर शेख ने पटकावला तृतीय क्रमांक
संगमनेर LIVE | संगमनेर महाविद्यालयामध्ये राबवण्यात येत असलेल्या प्रगत पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यानी आपल्या यशाचा ठसा उमटवत महाविद्यालयाची मान उंचावली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये भगवान विठ्ठल अहिरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, ॲड. राजू बबनराव खरे यांनी द्वितीय आणि अफसर नजीर शेख यांनी तृतीय क्रमांक मिळवून आपल्या अभ्यासपूर्ण कामगिरीच्या जोरावर दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्याच्या या यशामागे डॉ. संतोष खेडलेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. पत्रकारितेचे सूक्ष्म पैलू, प्रभावी लेखन कौशल्य, सामाजिक जाणीव आणि या क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञान देण्याचे काम त्यांनी अत्यंत निष्ठेने केले, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनीही विद्यार्थ्याना सातत्याने प्रोत्साहन देऊन अभ्यासक्रम अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले.
यावेळी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड म्हणाले की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून आमच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून या महत्त्वाच्या स्तंभाची निर्मिती होत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ‘आजचे विद्यार्थी हे उद्याचा प्रगल्भ समाज घडवतील’ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, विद्यार्थ्याच्या या यशामुळे सध्या संगमनेर महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून, शिक्षकवृंद व मित्रपरिवाराकडून यशस्वी विद्यार्थ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हे विद्यार्थी भविष्यात पत्रकारिता क्षेत्रात नक्कीच उत्तम कार्य करतील, अशी खात्री व्यक्त केली जात आहे.