गगनगिरी महाराज हरिनाम सप्ताह आणि कृषि महोत्सवाची जय्यत तयारी
◻️ पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांनी नियोजनाचा घेतला आढावा
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे दि. ८ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘प. पू. गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह' आणि ‘भव्य कृषी महोत्सवा'च्या पूर्वतयारीची पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांनी पाहणी केली. या धार्मिक आणि कृषी महोत्सवाच्या नियोजनाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.
जवळे कडलग येथील कार्यक्रमानंतर पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ पाटील यांनी थेट गुंजाळवाडी येथील सप्ताह स्थळी भेट दिली. यावेळी सप्ताहासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची निवासाची व्यवस्था, महाप्रसाद, वाहतूक नियोजन, तसेच कृषि प्रदर्शनाचे स्टॉल्स आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तयारीबाबत सप्ताह कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली.
सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीप शिंदे आणि आबासाहेब थोरात यांनी महोत्सवाचे नियोजन मांडले. सप्ताहासाठी येणाऱ्या भाविकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी पाणी, वीज, आरोग्य सुविधा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कमिटीने केलेल्या उपाययोजनांचे पालकमंत्री व आमदारांनी कौतुक केले.
यावेळी ‘भव्य कृषी महोत्सवा’त आधुनिक शेतीची तंत्रे आणि प्रगत शेती अवजारे शेतकऱ्यांपर्यत पोहोचवण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, याप्रसंगी सप्ताह कमिटीच्या वतीने पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी बन्सी महाराज गुंजाळ, संदीप घुगे, जनार्दन आहेर, पृथ्वीराज थोरात, पोपट गुंजाळ, रोहिदास गुंजाळ, युवराज गुंजाळ यांच्यासह गगनगिरी महाराज भक्त मंडळाचे सदस्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.