खांडगावात भक्तीमय वातावरणात पार पडला शिव-पार्वती विवाह सोहळा
◻️ भावी वर-वधूवर शिव-पार्वतीच्या रूपात झाली अक्षदांची उधळण
संगमनेर LIVE | खांडगाव येथील ओम इच्छापूर्ती कपालेश्वर देवस्थानच्या प्रांगणात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या शिवपुराण महाकथेचा सांगता सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. यावेळी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा शुभविवाह सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला.
मनोहर महाराज शिनारे यांच्या रसाळ वाणीतून सुरू असलेल्या या शिवपुराण महाकथेच्या माध्यमातून परिसरातील वातावरण शिवमय झाले होते. विवाह सोहळ्यासाठी भगवान शंकर म्हणून अनिकेत पांडुरंग बालोडे तर माता पार्वती म्हणून सपना शिवाजी गुंजाळ यांनी भूमिका साकारली. मंगलाष्टकांचे स्वर आणि अक्षतांचा वर्षाव होत असताना झालेला हा विवाह सोहळा उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
विवाह सोहळ्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी शुभाशीर्वाद दिले. यावेळी कथास्थळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली आणि ‘हर हर महादेव’चा जयघोष करत भाविकांनी आनंद व्यक्त केला. महिलांनी फुगडीचा फेर धरला, तर युवकांनी आणि पुरुषांनी पारंपरिक ठेका धरत आनंदाला वाट करून दिली.
या सोहळ्यात, शंकर-पार्वतीची भूमिका साकारणारे अनिकेत आणि सपना हे खऱ्या आयुष्यातही १९ जून २०२६ रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. परंतु, त्यापूर्वीच शिव-पार्वतीच्या रूपाने त्यांच्यावर अक्षतांचा वर्षाव झाल्याचा हा योगायोग भाविकांच्या चर्चेचा विषय ठरला.
याप्रसंगी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले, “आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात अध्यात्माची नितांत गरज आहे. शिवपुराण महाकथेसारख्या उपक्रमांतून भाविकांना मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच, वारकरी संप्रदायाची आणि भक्तीची परंपरा जपण्याचे काम नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे.”