आषाढी वारीत सहभागी दिड्यांना मुबलक गॅस टाक्या उपलब्ध करून द्या!
◻️ आमदार अमोल खताळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन
संगमनेर LIVE | आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या दिंड्या आणि वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी, वारी मार्गावर गॅसचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शिर्डी येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी याबाबतचे निवेदन सादर केले.
आषाढी वारीच्या काळात लाखो वारकरी पंढरपूरच्या वाटेवर असतात. या काळात जागोजागी उभारल्या जाणाऱ्या अन्नछत्रे, महाप्रसाद, वारकऱ्यांसाठीची मोफत भोजन केंद्रे आणि तात्पुरत्या निवासस्थानांसाठी हजारो सेवेकरी दिवस-रात्र कार्यरत असतात. या सेवा कार्यासाठी गॅस सिलेंडरची मोठी गरज भासते, मात्र वारीच्या काळात अचानक वाढणाऱ्या मागणीमुळे अनेक ठिकाणी गॅस टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका अन्नछत्रे आणि भोजन व्यवस्थेला बसून हजारो वारकऱ्यांची मोठी गैरसोय होऊ शकते, ही गंभीर बाब आमदार खताळ यांनी निवेदनातून मांडली आहे.
या समस्येवर उपाय म्हणून आमदार खताळ यांनी वारी मार्गावरील गावे आणि प्रमुख मुक्काम स्थळांवर गॅसचा अतिरिक्त साठा उपलब्ध ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच, गॅस वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करावेत आणि अन्नछत्रे व वारकरी सेवा केंद्रांना गॅसचा पुरवठा प्राधान्याने करावा, जेणेकरून वारकऱ्यांच्या भोजनात कोणताही व्यत्यय येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा असून लाखो भाविकांची सेवा करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. वारीदरम्यान वारकऱ्याला अन्न, पाणी किंवा मूलभूत सोयींसाठी त्रास होऊ नये, यासाठी शासनाने आतापासूनच नियोजनबद्ध उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे आमदार खताळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, वारकऱ्यांच्या मूलभूत गरजांचा विचार करून तातडीने शासनाकडे पाठपुरावा केल्याबद्दल वारकरी संप्रदाय, दिंडी प्रमुख आणि विविध सेवाभावी संस्थांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.