शिर्डी-पुणे महामार्गाचे काम शिबलापूर-पानोडी शिवारात रेंगाळले
◻️लहान-मोठे अपघाताची मालिका; धिम्म्या कामामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संताप
संगमनेर LIVE | शिर्डी ते पुणे या राज्य मार्ग ६७ मधील राहाता ते पानोडी घाट पायथा या रस्त्याचे काम प्रशासकीय दिरंगाई आणि कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळे धिम्या गतीने सुरू आहे. काम सुरू होऊन एक वर्ष उलटूनही रस्ता अर्धवट असल्याने हा रस्त्यावर नियमित लहानमोठे अपघात होत आहेत.
शिबलापूर ते पानोडी घाट दरम्यानचा रस्ता खोदून आता वर्ष पूर्ण झाले आहे. रस्ता पूर्ण करण्याऐवजी तो तसाच अर्धवट स्थितीत ठेवल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या खडबडीत आणि खड्डेमय रस्त्यामुळे दुचाकीसह चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, गाड्या ‘खिळखिळ्या’ झाल्या आहेत. “काम पूर्ण करायचे नव्हते तर रस्ता खोदून ठेवलाच का?“ असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पानोडी येथील काळूबाईच्या ओढ्यावरील पुलाचे काम गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या कामासाठी तयार करण्यात आलेला पर्यायी वळण रस्ता अत्यंत अरुंद आणि धोकादायक आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने अनेक वाहने ओढ्यात किंवा नाल्यात कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने आतापर्यंत मोठी जीवितहानी झाली नसली तरी, अपघातांचे सत्र सुरूच आहे.
रस्त्याचे काम रेंगाळल्याने परिसरात प्रचंड धुळीचे लोट उसळत आहेत. यामुळे रस्त्याकाठी राहणाऱ्या ग्रामस्थांना श्वास घेण्यासह घरांमध्ये धुळीचे थर साचत असल्याने दुहेरी मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान, “ज्या वाहनधारकांचे अपघात झाले आहेत किंवा गाड्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना कंत्राटदाराने किंवा संबंधित विभागाने भरपाई द्यावी," अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी करत आहे. तसेच हा रस्ता तातडीने पूर्ण करावा अन्यथा आंदोलन करु असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.