इंधनाच्या जागतिक संकटावर ‘इथेनॉल’ हाच प्रभावी पर्याय - बाळासाहेब थोरात
◻️थोरात साखर कारखान्यात १ कोटी ४० लाख लिटर इथेनॉलची निर्मिती
संगमनेर LIVE | जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युध्दामुळे सध्या इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या वाढत्या इंधन समस्येला तोंड देण्यासाठी ‘इथेनॉल' हा एक सक्षम आणि शाश्वत पर्याय म्हणून समोर आला असून, संपूर्ण जगाला आता त्याचे महत्त्व पटले आहे, असे प्रतिपादन काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पातून चालू हंगामात १ कोटी ४० लाख लिटर इथेनॉलची विक्रमी निर्मिती करण्यात आली. या यशाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, “राज्यात अनेक सहकारी कारखान्यांमध्ये अल्कोहोलपासून दारूची निर्मिती केली जाते. मात्र, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीचे पालन करत या कारखान्यात दारू न बनवता केवळ ‘इंडस्ट्रियल अल्कोहोल’ आणि ‘इथेनॉल'ची निर्मिती केली जाते. सामाजिक बांधीलकी आणि नैतिक मूल्ये जपत कारखान्याने आपली प्रगती साधली आहे.”
कारखान्याची आर्थिक गणिते मांडताना थोरात यांनी सांगितले की, केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता वीज निर्मिती आणि इथेनॉल प्रकल्प हे कारखान्यासाठी मोठे आधारस्तंभ ठरले आहेत. याच उपपदार्थाच्या उत्पादनामुळे कारखान्याची वाटचाल यशस्वी सुरू असून शेतकऱ्यांना कायम उच्चांकी भाव देणे शक्य झाले आहे.
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईवर इथेनॉल हाच उपाय आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळवून देण्यासाठी ठोस धोरण आखण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान, सांघिक प्रयत्न आणि पारदर्शक कारभारामुळेच थोरात कारखान्याने यशाचे नवे शिखर गाठले असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.