युवकांनी कष्टाच्या जोरावर गावाचे नाव उज्ज्वल केले - आमदार अमोल खताळ
◻️ धुमाळवाडीच्या पाच सुपुत्रांची महाराष्ट्र पोलिस दलात निवड
संगमनेर LIVE | ग्रामीण भागातील युवकांमध्ये प्रचंड जिद्द आणि चिकाटी असते. कठोर परिश्रम आणि कुटुंबाच्या खंबीर पाठबळाच्या जोरावर डोळासने (धुमाळवाडी) येथील पाच तरुणांनी महाराष्ट्र पोलिस दलात स्थान मिळवून गावाचा नावलौकिक वाढवला आहे, अशा शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी नवनियुक्त पोलिस जवानांचे कौतुक केले.
संगमनेर तालुक्यातील डोळासने गावांतर्गत धुमाळवाडी येथील गणेश रावसाहेब भागवत, योगेश बारकू धुमाळ, विजय प्रभाकर भोईटे, धनंजय सिताराम गांजवे आणि वृषभ यशवंत सुपेकर या पाच तरुणांची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली आहे. या यशाबद्दल आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या तरुणांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार खताळ म्हणाले की, “पोलिस दल हे समाजातील कायदा व सुव्यवस्था राखणारे महत्त्वाचे अंग आहे. पोलिस दलात सेवा बजावताना या तरुणांनी गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करावे. जनसामान्यांचा पोलिस प्रशासनावरील विश्वास वाढवण्यासाठी संवेदनशील राहून आपली जबाबदारी पार पाडावी.” असे नमूद केले.
सत्कारमूर्ती तरुणांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीयांचे त्याग आणि मार्गदर्शकांना दिले. “गावातील इतर युवकांनीही या यशातून प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घ्यावी,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
दरम्यान, या सोहळ्याला महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक, पालक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.