ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यामुळे तालुक्यात ३०० नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित!
◻️ यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यातून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवले
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मागील काही दिवसांत मोठी मोहीम राबवण्यात आली. मागील काही महिन्यांतील वाढत्या उष्णतेमुळे शेती आणि घरगुती वापरासाठी विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला होता, परिणामी तालुक्यातील अनेक गावांत ट्रान्सफॉर्मर जळण्याच्या घटना घडल्या होत्या. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढत, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन जनसंपर्क कार्यालयाने थेट वीज वितरण विभागाकडे पाठपुरावा करून तब्बल ३०० नवीन ट्रान्सफॉर्मर (६३ केव्ही आणि १०० केव्ही) तालुक्यातील विविध गावांमध्ये बसवले आहेत.
संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून, त्यात १७१ गावे आणि २५८ वाड्यांचा समावेश आहे. डॉ. जयश्री थोरात आणि इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयातील वीज समस्या निवारण कक्षाद्वारे गेल्या दहा वर्षांपासून नागरिकांच्या अडचणी सोडवल्या जातात. याच कक्षाकडे शेतकऱ्यांनी जळालेल्या ट्रान्सफॉर्मरबाबत तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत, वीज वितरण विभागाच्या सहकार्याने तळेगाव, साकुर, वडगावपान, जोर्वे, धांदरफळ, आश्वी, घुलेवाडी आणि समनापूर अशा विविध गटांतील गावांमध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आले आहेत.
दरम्यान, लोहारे येथील गावकऱ्यांनी नवीन १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. नियमित आणि सुरळीत वीज पुरवठ्यामुळे शेतीकामांना गती मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या यशोधन कार्यालयाच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे.