“अल निनोचे संकट टळू दे, बळीराजा सुजलाम सुफलाम होऊ दे!”
◻️ मंत्री विखे पाटील यांनी गगनगिरी महाराज सप्ताहात व्यक्त केली भावना
संगमनेर LIVE | “अल निनोचे संकट दूर होऊन वरुणराजाने कृपेचा वर्षाव करावा, जेणेकरून बळीराजाचा शेतकरी सुखी होईल,” अशी प्रार्थना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गगनगिरी महाराजांच्या चरणी केली. गुंजाळवाडी येथे आयोजित त्रैवार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.
सध्याच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील म्हणाले की, “यंदा पावसाचे आगमन लांबल्याने ‘अल निनो’चे मोठे संकट उभे राहिले आहे. या परिस्थितीचा विचार करून सरकारने राज्यातील धरणांमधील पाणीसाठे आरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सिंचनाचे सर्व आवर्तन तात्पुरते थांबवून ३१ ऑगस्टपर्यंत पाणी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
अधिक मासानिमित्त आयोजित या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा जपल्याबद्दल त्यांनी गगनगिरी महाराज भक्त परिवाराचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांनी मंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन केले.
दरम्यान, या सोहळ्याला नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, आमदार अमोल खताळ यांच्यासह अनेक मान्यवर आणि हजारो भाविक उपस्थित होते. सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीप शिंदे आणि संयोजक आबासाहेब थोरात यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला.