निरोगी आयुष्यासाठी ‘योग’ हीच काळाची गरज - आमदार अमोल खताळ
◻️ संगमनेरकरांना दिला दररोज योगाभ्यासाचा संकल्प करण्याचा संदेश
संगमनेर LIVE | आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी ‘योग’ हाच सर्वोत्तम पर्याय आहे. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर शहरातील गणेशनगर परिसरात पतंजली योग समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक-युवती उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले, “भारताने जगाला दिलेली योगाची अमूल्य देणगी आज संपूर्ण जग स्वीकारत आहे. योग ही केवळ एक व्यायाम पध्दती नसून ती शरीर, मन आणि आत्म्याला जोडणारी आणि निरोगी ठेवणारी एक श्रेष्ठ जीवनशैली आहे. नियमित योगामुळे शरीराची लवचिकता वाढते आणि मानसिक एकाग्रता सुधारून विविध आजारांपासून संरक्षण मिळते.”
दरम्यान, आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आमदार खताळ यांनी स्वतः आपल्या निवासस्थानी योगासने व प्राणायाम केले. तणावमुक्त आणि ऊर्जावान राहण्यासाठी योगाचा विसर पडू देऊ नका, असे सांगत त्यांनी उपस्थित सर्वांना दररोज आपल्या दिनचर्येत योगाचा समावेश करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.