रेल्वेमंत्र्यांचा निर्णय अनाकलनीय; आमदार खताळांनी दिला संघर्षाचा इशारा
◻️ पुणे-नाशिक सरळ रेल्वे मार्ग रद्द झाल्यामुळे संगमनेरकरांच्या स्वप्नांना सुरुंग
संगमनेर LIVE | पुणे - नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्प अचानक रद्द करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय संगमनेर आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला मोठा धक्का देणारा आहे. दूरसंचार केंद्राचे कारण पुढे करत हा प्रकल्प गुंडाळण्याच्या निर्णयामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी आणि व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या अन्यायी निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्धार आमदार अमोल खताळ यांनी केला आहे.
या प्रकल्पाबाबत माध्यमाशी बोलताना आमदार खताळ म्हणाले की, प्रस्तावित रेल्वे मार्गापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावरून रेल्वे लाईन नेण्यास दूरसंचार केंद्राने यापूर्वीच आपली लेखी संमती दिली होती. असे असतानाही रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी हा प्रकल्पच रद्द करण्याची घोषणा करणे, हे अनाकलनीय आणि अन्यायकारक आहे. अशी खंत व्यक्त केली.
या प्रकल्पासाठी संगमनेर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी संपादित करण्यासाठी दिल्या होत्या. त्यांना शेकडो कोटी रुपयांची भरपाई देखील देण्यात आली आहे. प्रकल्पाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर पुढे गेलेली असताना अचानक असा निर्णय घेणे म्हणजे जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असल्याचे आ. खताळ यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, हा केवळ वाहतुकीचा प्रकल्प नसून तो उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला गती देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे,” असे मत आमदार खताळ यांनी व्यक्त केले.
दरम्यान, या निर्णयावर फेरविचार व्हावा यासाठी ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन संगमनेरची भूमिका आक्रमकपणे मांडणार आहेत. तसेच कायदेशीर बाबींची पडताळणी करून गरज पडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.