संगमनेरच्या ५९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ११.८८ कोटी रुपये जमा - आमदार अमोल खताळ
◻️ खरीप हंगामाच्या तोंडावर पीएम-किसानचा २३ वा हप्ता जमा
संगमनेर LIVE | केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' (पीएम-किसान) योजनेचा २३ वा हप्ता देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. या योजनेचा संगमनेर तालुक्यातील तब्बल ५९ हजार ४०३ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, त्यांच्या बॅक खात्यावर ११ कोटी ८८ लाख ६ हजार रुपयांची मदत थेट जमा झाली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे तालुक्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांत दिली जाते. प्रत्येक हप्त्यात २ हजार रुपये थेट लाभार्थींच्या बॅक खात्यात जमा केले जातात. बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करण्यासाठी तसेच शेतीशी संबंधित इतर खर्चांसाठी ही मदत अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
याबाबत बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, “केंद्र शासनाच्या या योजनेचा संगमनेर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना थेट लाभ होत असून, शेती उत्पादन वाढीसाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे. विशेषतः खरीप पेरणीच्या काळात मिळणारी ही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या कृषी निविष्ठा खरेदीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोलाची ठरेल."
दरम्यान, कृषी विभागाने सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांचे आधार कार्ड बॅक खात्याशी लिंक केलेले नाही, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी. कागदपत्रे अपूर्ण असल्यास पुढील हप्त्यांचा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली माहिती तातडीने अद्ययावत करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान या निधी वितरणामुळे तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही नवी चालना मिळणार असून, खरीप हंगामातील आर्थिक नियोजनासाठी शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.