सप्ताहातून नवचैतन्यासह नवीन पिढीला संस्कारांची दिशा मिळेल - सौ. नीलम खताळ
◻️ गुंजाळवाडीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला सौ. खताळांची हजेरी!
संगमनेर LIVE | गेल्या काही महिन्यांपासून ज्या सोहळ्याची सर्वांना प्रतीक्षा होती, तो परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह गुंजाळवाडी येथे मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. या धार्मिक पर्वामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून, वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता आणि ऊर्जा निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन सौ. नीलम खताळ यांनी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह शुभारंभ प्रसंगी केले आहे.
सौ. खताळ पुढे म्हणाल्या की, “स्वामी गगनगिरी महाराजांच्या कृपेने संगमनेरवासीयांना या दिव्य दर्शनाचा आणि सत्संगाचा लाभ मिळत आहे. सप्ताहासारख्या उपक्रमांतून केवळ अध्यात्मच नाही, तर ज्येष्ठांकडून संस्कार आणि जीवनमूल्यांचे शिक्षण मिळते. अशा धार्मिक कार्यक्रमांमधूनच नवीन पिढीला योग्य दिशा देण्याचे मोलाचे कार्य घडते.” असे नमूद केले.
जनतेच्या विश्वासामुळे आणि देवाच्या आशीर्वादाने खताळ कुटुंबाला लोकसेवेची संधी मिळाली आहे, असे सांगताना त्या पुढे म्हणाल्या, “जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे सोने करून परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. हा सप्ताह कोणत्याही एका व्यक्तीचा नसून, तो संपूर्ण समाजासाठी एक खुले व्यासपीठ आहे. या आध्यात्मिक पर्वामुळे तालुक्यात भक्ती, एकता आणि सामाजिक सलोखा यांचे सुंदर दर्शन घडत आहे.” असे गौरवोद्गार काढले.
दरम्यान, गुंजाळवाडी येथे आयोजित या सप्ताहात उपस्थित राहून प्रत्येक नागरिकाने या भक्तीचा आनंद घ्यावा, असे आवाहनही सौ. नीलम खताळ यांनी केले आहे.