आमदार अमोल खताळाच्या पाठपुराव्यातून तालुक्यात ८०० रोहित्र निःशुल्क बसविले
◻️ शेतकरी वर्गाला मोठा दिलासा; वीज पायाभूत सुविधांचे बळकटीकरण
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात गेल्या दीड वर्षात वीज वितरण व्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला असून, आता जळालेले वीज रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बदलण्यासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत नाही. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आता शेतकऱ्यांकडून एकही रुपया न घेता अवघ्या तीन ते चार दिवसांत नवीन रोहित्र उपलब्ध करून दिले जात आहे. आमदार अमोल खताळाच्या पाठपुराव्यातून तालुक्यात आतापर्यत ८०० रोहित्र निःशुल्क बसवण्यात आले आहे.
यापूर्वी वीज रोहित्र जळाल्यानंतर ते बदलण्यासाठी शेतकऱ्यांना २० ते २५ हजार रुपयांची वर्गणी गोळा करावी लागत असे. इतकी मोठी रक्कम भरूनही नवीन रोहित्र मिळण्यासाठी २० ते २५ दिवसांचा कालावधी लागत होता. यामुळे शेतीची कामे ठप्प होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असे. मात्र, आता महावितरण प्रशासनाशी समन्वय साधून ही प्रक्रिया अत्यंत वेगवान आणि पारदर्शक करण्यात आली आहे.
केवळ रोहित्र बदलणेच नव्हे, तर तालुक्यातील वीज क्षमता वाढवण्यासाठीही प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. जिल्हा नियोजन समिती आणि आमदार निधीतून एकूण १८९ नवीन वीज रोहित्र कार्यान्वित करण्यात आले असून, या नवीन रोहित्रांमुळे अनेक गावांमधील ओव्हरलोड आणि कमी दाबाच्या समस्या कायमच्या दूर झाल्या आहेत.
तसेच, राजापूर, जवळेकडलग, धांदरफळ खुर्द यांसह अनेक परिसरातील वीज उपकेंद्रांची क्षमता वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न सुटला आहे. तालुक्यात वीज पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आतापर्यंत सुमारे एक कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून यामुळे वीज पुरवठा अधिक विश्वासार्ह झाला आहे.
“संगमनेर तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहकांना दर्जेदार व अखंड वीजपुरवठा मिळावा, हे आमचे मुख्य ध्येय आहे. शेतीपंपांना नियमित वीज मिळावी आणि त्यासाठी शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक भार पडू नये, यासाठी आम्ही महावितरणला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. भविष्यातही वीज समस्या टप्प्याटप्प्याने सोडवण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरूच राहील," असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
दरम्यान, या बदलामुळे संगमनेरच्या ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण असून, शेतीसाठी आवश्यक असणारा अखंडित वीजपुरवठा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.