आमदार व्हायचे असते तर दोन महिन्यांपूर्वीच झालो असतो - डॉ. सुजय विखे पाटील
◻️ मनोरुग्णांवर उपचार करण्यासाठी मेंदूचा डॉक्टर येतोय; विरोधकान दिला इशारा
संगमनेर LIVE (लोणी) | आज काही जण ज्या पदांचा आनंद घेत आहेत, ती पदे आम्ही स्वेच्छेने सोडून दिलेली आहेत. पद मिळाल्यानंतर त्याचा आनंद घ्यावा, परंतु त्यातून माज, अहंकार किंवा मगरुरी निर्माण होता कामा नये. लोकांनी दिलेल्या सन्मानाची जाणीव ठेवून काम करणे आवश्यक आहे. पद हे लोकांची कामे करण्यासाठी असते. समाजाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.
राहाता तालुक्यातील लोणी येथे प्रवरा बॅकेच्या यूपीआय बॅकिंग सेवेच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, काही लोकांना कारखान्याचे चेअरमन व्हायचे असते, काहींना आमदार व्हायचे असते, तर काही जण विविध पदांसाठी धडपड करत असतात. मात्र आम्हाला आमदार व्हायचे असते, तर दोन महिन्यांपूर्वीच झालो असतो. पद मिळवणे हा आमचा उद्देश नाही. लोकांमध्ये जाण्यासाठी, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी आणि समाजकारण करण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नसते. जनतेचा विश्वास आणि प्रेम हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे.
राजकारणातील चढ-उतारांचा उल्लेख करताना त्यांनी आपल्या अनुभवांचाही संदर्भ दिला. पद यायला आणि जायला वेळ लागत नाही. मी स्वतः त्याचा जिवंत अनुभव घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही पदाचा गर्व न करता जमिनीवर राहून काम केले पाहिजे. पद कायमस्वरूपी नसते, मात्र लोकांशी असलेले नाते कायम राहते. म्हणूनच जनतेचा विश्वास जपणे हे कोणत्याही पदापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
विखे पाटील परिवाराच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, गेल्या अनेक दशकांपासून जनतेने आमच्या परिवारावर प्रेम केले आहे. आजही आम्ही गावात गेलो की लोक आपुलकीने भेटतात, स्वागत करतात. हे प्रेम आणि विश्वास कोणत्याही पदापेक्षा मोठे आहे. त्यामुळे पद मिळाले म्हणून लोकांपासून दूर जाणे किंवा सत्तेच्या बळावर वागणे योग्य नाही.
राजकीय विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी सूचक शब्दांत टोला लगावला. गेल्या सहा महिन्यांत आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे आता जास्त बोलण्याची गरज नाही. मेंदूचा डॉक्टर काही काळ बाहेर राहिल्यामुळे काही मनोरुग्ण बाहेर पडायला लागले आहेत. आता डॉक्टर परत येणार असून सर्वांवर उपचार करणार आहे, असे सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला.
समाजकारण, विकास आणि जनतेच्या प्रश्नांबाबत आपण पूर्वीप्रमाणेच सक्रिय राहणार असल्याचे सांगताना त्यांनी कार्यकर्त्यांनाही जनतेशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे आवाहन केले. लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची आणि विकासाच्या कामांसाठी पाठपुरावा करण्याची परंपरा कायम ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील आगामी सहकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील यांच्या या परखड आणि आक्रमक वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पदापेक्षा लोकांचा विश्वास मोठा असून जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर कायम ठाम भूमिका घेत राहू, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.