साकूर-बिरेवाडी रस्त्याच्या कामात गुणवत्तेशी तडजोड करु नका!
◻️ आमदार अमोल खताळ यांच्याकडून रस्त्याच्या कामाची अचानक पाहणी
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर ते बिरेवाडी या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित होते. अखेर, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि स्थानिक आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांतून या रस्त्यासाठी पावणे सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, प्रत्यक्ष कामाला गती मिळाली आहे. या विकासात्मक निर्णयामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
विकासकामांची पाहणी करण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय थेट कामाच्या ठिकाणी धाव घेतली. रस्त्याच्या दर्जाची आणि गुणवत्तेची त्यांनी स्वतः पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ठेकेदाराला सक्त ताकीद दिली की, रस्त्याचे काम केवळ नियोजित वेळेतच पूर्ण व्हायला हवे असे नाही, तर त्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा निकृष्ट दर्जा खपवून घेतला जाणार नाही.
यापूर्वी रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना आमदार खताळ यांनी ठेकेदाराला कडक शब्दांत इशारा दिला होता. “मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुम्हाला नारळ दिला आहे, मात्र काम निकृष्ट दर्जाचे झाले तर तुमची गावातून मिरवणूक काढू,” अशी तंबी त्यांनी दिली होती. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेवर साकूर आणि बिरेवाडीकरांचे बारीक लक्ष आहे.
दरम्यान, आमदार अमोल खताळ हे सातत्याने विकासकामांवर प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन लक्ष ठेवत आहेत. त्यांच्या या सजग कार्यपध्दतीची सध्या संगमनेर तालुक्यात मोठी चर्चा होत असून, प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.