शेवगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे भूमिपूजन
◻️ नामदार आठवले आणि डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत रिपाइं-भाजपा युती अधिक बळकट
संगमनेर LIVE (शेवगाव) | शेवगाव शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवात मोठी भर पडणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पूर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभीकरणाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी आयोजित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अहिल्यानगर दक्षिण विभाग संकल्प मेळाव्यात मार्गदर्शन करताना नामदार रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची महती सांगितली.
नामदार आठवले म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे केवळ एका समाजासाठी नसून संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी आहेत. त्यांचे कार्य आणि विचार नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत. शेवगावात उभारला जाणारा हा पुतळा म्हणजे केवळ एक शिल्प नसून, समता आणि न्यायाच्या विचारांचे प्रतीक आहे. केंद्र सरकार समाजातील तळागाळातील लोकांच्या विकासासाठी कटिबध्द असून, रिपाइं आणि भाजपाची युती ही याच विकास ध्येयाला पूर्ण करण्यासाठी सदैव कार्यरत राहील.” असे नमूद केले.
यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यातील युती ही केवळ राजकीय नसून ती विकासात्मक आहे. “आम्ही दोघेही पक्ष विकासाच्या समान ध्येयाने प्रेरित आहोत. भविष्यातही दोन्ही पक्ष जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकदिलाने कार्यरत राहतील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रिपाइंचे नेते सुनील साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या संकल्प मेळाव्यात सामाजिक समता, विकास आणि संघटनात्मक बळकटीचा निर्धार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी स्थानिक रिपाइं सह महायुतीचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी अरुण मुंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.