संगमनेरकरमध्ये लवकरच सुरू होणार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; लाखो नागरिकांची गैरसोय होणार दूर
संगमनेर LIVE | संगमनेर आणि अकोले तालुक्यासाठी आवश्यक असलेला आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आमदार अमोल खताळ यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, हे कार्यालय लवकरच कार्यान्वित होणार आहे.
सध्या संगमनेर आणि अकोले तालुक्यातील नागरिकांना वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र, परमिट आणि मालकी हक्क हस्तांतरण यांसारख्या कामांसाठी अहिल्यानगरला धाव घ्यावी लागत होती. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणावर वाया जात होते. आता हे सर्व कामकाज संगमनेरमध्येच होणार असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
“गेल्या चाळीस वर्षांत जे शक्य झाले नाही, ते आम्ही अवघ्या दीड वर्षात करून दाखवले आहे," असे म्हणत आमदार अमोल खताळ यांनी या यशाचे श्रेय आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला दिले. तसेच, या कामाचे खोटे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर त्यांनी कडक शब्दांत टीका केली. “काहीजण फुकटचे श्रेय घेण्यास माहीर असून, सोशल मीडियावर नौटंकी करण्यातच धन्यता मानतात,” असा टोलाही त्यांनी लगावला.
आमदार अमोल खताळ यांनी जानेवारी २०२५ पासून या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. २३ जानेवारी २०२५ पासून सातत्याने परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत मंत्रालयात झालेल्या बैठका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेली निवेदने आणि त्यातून मिळालेली सकारात्मक आश्वासने यामुळे हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या असलेल्या संगमनेर व अकोले तालुक्यातील नागरिकांच्या प्रवासाचा त्रास कमी होणार असून प्रशासकीय कामांत गती येणार आहे.