शेतकरी कर्जमाफीची बैठक ऐनवेळी रद्द; शिष्टमंडळ संतापले
◻️ सरकारचा निषेध करत डॉ. अजित नवले यांचा आंदोलनाचा इशारा
संगमनेर LIVE (मुंबई) | शेतकरी कर्जमाफीच्या अटी-शर्तींवर चर्चा करण्यासाठी बोलावलेली अधिकृत बैठक सरकारी प्रतिनिधींच्या अनुपस्थितीमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी नेत्यांनी सरकारच्या भूमिकेचा कडाडून निषेध करत, आता राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
राज्यातील शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार बंटी पाटील, आमदार रोहित पवार, महादेव जानकर आणि डॉ. अजित नवले यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व शेतकरी नेते उपस्थित होते. मात्र, सरकारी प्रतिनिधी प्रवीण परदेशी यांनी बैठकीस उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवल्याने ही बैठक रद्द करण्यात आली.
अखिल भारतीय किसान सभेचे राज्यसचिव डॉ. अजित नवले यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “कर्जमाफीच्या अटी आणि शर्तींमुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. या अन्यायकारक धोरणांचा युक्तिवाद करणे सरकारला शक्य नसल्यानेच त्यांनी ही बैठक रद्द केली,” असा आरोप डॉ. नवले यांनी केला. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेवरूनच ही बैठक जाणीवपूर्वक टाळल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, सरकारच्या या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या किसान सभेने आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कर्जमाफीच्या अटींमध्ये बदल करण्याच्या मागणीसाठी आता सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी घोषणा डॉ. अजित नवले यांनी केली आहे.