खांद्यावर झेंडा कोणताही असू द्या, दांडा मात्र मराठीचाच ठेवा - विश्‍वास पाटील

संगमनेर Live
0
खांद्यावर झेंडा कोणताही असू द्या, दांडा मात्र मराठीचाच ठेवा - विश्‍वास पाटील

◻️ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ‘पद्मश्री विखे पाटील पुरस्कारा’चे वितरण


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | भविष्यकाळ अंधकारमय होण्यापूर्वीच मराठी शाळांच्या सुधारणेचा आग्रह धरावा लागेल. मराठी शाळा आणि पुस्तके पुरवणारी ग्रंथालयं ही मराठीची खरी वस्त्र आहेत. खरा महाराष्ट्र कळायचा असेल तर, मराठीसाठी धाडसाने काहीतरी करावे लागेल, असा आशावाद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कारांचे वितरण राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ९९ व्‍या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्‍यक्ष विश्‍वास पाटील हे होते. या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, आमदार मोनिका राजळे, आमदार काशिनाथ दाते, आमदार आशुतोष काळे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार संग्राम जगताप, आमदार अमोल खताळ, आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार लहू कानडे, चंद्रशेखर कदम, जिल्हा बॅकेचे माजी चेअरमन चंद्रशेखर घुले, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, सौ. शालिनीताई विखे पाटील, ध्रुव विखे पाटील, अविनाश आदिक, सौ. अनुराधा नागवडे, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, भाजपाचे अध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यंदाच्या वर्षी पुरस्कार निवड समितीने ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ उत्तम कांबळे (नाशिक) यांना जाहीर केला आहे. याशिवाय ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार' संहिता राजन (पुणे), ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार' सुरेंद्र दरेकर (पुणे), ‘डॉ. विखे-पाटील राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार' तमाशा कलेतील सेवेबद्दल मालती इनामदार (नारायणगाव), ‘डॉ. विखे-पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार' सचिन शिंदे (नाशिक), ‘डॉ. विखे-पाटील राज्यस्तरीय समाजप्रबोधन पुरस्कार' मराठी अभ्यास परिषद (पुणे) या संस्थेस, ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा साहित्य पुरस्कार' निवृत्ती जोरी (संगमनेर) आणि ‘डॉ. विखे पाटील प्रोत्साहनपर साहित्य पुरस्कार' संजय गोर्डे (संगमनेर) यांना सन्‍मानित करण्‍यात आले. पुरस्‍कार निवड समितीचे अध्‍यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी पुरस्‍कारची घोषणा केली.

आपल्या भाषणात विश्‍वास पाटील यांनी विखे पाटील साहित्य पुरस्काराचा गौरवपूर्ण उल्लेख करून सांगितले की, सहकाराच्या भूमीतील मातीने हा परिसर ऐतिहासिक केला आहे. तसाही या जिल्ह्याचा इतिहास महाभारतापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिकच आहे. शिवाजी महाराजांचे साडेतीन वर्षांपर्यंतचे बालपण हे याच जिल्ह्यामध्ये गेले. नाशिकच्या गोदेपासून ते पुण्याच्या भीमेच्या तिरापर्यंतचा अभिमान हा संपूर्ण राज्याला आहे. येथील मातीशी खूप जुनं नातं आहे. साहित्यिकांचा हा सन्मान सोहळा गुणग्राहकतेचा सोहळा असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्राला समृध्द आणि सुजलाम करायचे असेल तर, मायमराठीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागेल. यासाठी मराठी शाळा महत्त्वाच्या आहेत. भाषा शिकणे म्हणजे तंत्र आहे, कारण भारतामधील ९८ शास्त्रज्ञ हे मराठीतून शिकले आहेत. इंग्रजी शाळा या सोन्याच्या पिंजऱ्यात वाढलेले पोपट आहेत; मात्र जिल्हा परिषदेच्या शाळा या गरुडासारखी झेप घेऊन उंच भरारी घेत आहेत. कधीतरी या मराठी शाळांना भेट द्या, कारण ही आपली खरी मंदिरे आहेत. मराठी शाळा आणि पुस्तके पुरवणारी ग्रंथालये ही मायमराठीची खरी वस्त्रे आहेत. मराठी शाळा अजूनही सुधारू शकतात, मात्र यासाठी धाडसाने काहीतरी करावे लागेल. तुमच्या खांद्याववर झेंडा कोणताही असू द्या, दांडा मात्र मराठीचाच ठेवा, असे आग्रहपूर्ण आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या भाषणात म्हणाल्या की, सहकार पंढरीचे दर्शन घेण्याचे भाग्य आज मला मिळाले. स्व. आप्पासाहेब पवार यांचा उल्लेख करून, येथील वटवृक्षाशी आमचे भावनिक, जुने आणि जिव्हाळ्याचे नाते आहे, असे त्यांनी सांगितले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या कार्याची प्रेरणा महाराष्ट्राला सदैव मिळत आहे. विखे पाटील परिवाराची चौथी पिढी सक्रियपणे यासाठी काम करते, ही आनंदाची बाब आहे. आयुष्यभर साहित्य क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या लेखक आणि कलाकारांचा पुरस्काराने होत असलेल्या सन्मानाने पुरस्काराची प्रतिष्ठासुध्दा उंचावली आहे. लेखकांमधील संवेदनशील शक्ती आणि माणुसकीची जाणीव साहित्य समृद्ध करत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, या साहित्य पुरस्कारामुळे साहित्यिकांना बळ मिळाले आहे. समाज अक्षरांच्या मागे उभा राहतो, हे या पुरस्काराने दाखवून दिले आहे. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडून काय शिकलो असेल तर त्यांच्याकडून मी स्नेह शिकलो. राजकारणामध्ये सर्वांना मास्तर म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले. या भागातील राजकारण हे नैतिकतेच्या आधारावर चांगल्या पद्धतीने सुरू आहे. जे समाजासाठी लिहितात, बोलतात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे अभिवचन या पुरस्कारामध्ये आहे. उद्याचा समाज गतिरोधक वाटू नये म्हणून मार्गदर्शनाचा कंदील निर्माण करावा लागेल, यासाठी पद्मश्रींवरील चित्रपट काढण्याची सूचना त्यांनी आपल्या भाषणातून केली.

आपल्या प्रास्ताविकपर भाषणात मंत्री विखे पाटील यांनी प्रवरा परिवाराच्या ३६ वर्षांच्या साहित्य पुरस्कारांच्या वाटचालीचा आढावा घेऊन, या पुरस्काराने सन्मानित झालेल्या साहित्यिकांना साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले, हा खरा आमचा अभिमान आहे, असे सांगितले. यंदाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांचाही गौरव विखे पाटील पुरस्काराने झाला, ही आमच्यासाठी आनंदाची घटना आहे. प्रवराकाठी मराठी सारस्वतांचा होणारा सन्मान हा मराठी साहित्य, कला आणि संस्कृतीची अभिरुची जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांची उपस्थिती ही दोन्ही परिवारांचा ऋणानुबंध अधिक दृढ करणारी आहे. स्व. अजितदादांशी असलेले नाते आपल्या माध्यमातून भविष्यातही कायम राहील; आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका ही आमची सदैव असेल, असे मंत्री विखे पाटील म्हणाले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !